कोल्हापूर : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो; परंतु मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी सांगितले. याबाबतचे पत्र त्यांनी महापौर, पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांना पाठविले.
गेली १४ वर्षे मी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. कोल्हापुरात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. त्यासाठी अधिक नियोजन करण्याची गरज आहे. त्या संदर्भातील उपाययोजना या महासभेत केल्या असत्या तर ते अधिक योग्य झाले असते; पण तुम्ही सर्वांनी या महासभेत माझ्या आणि पंतप्रधान मोदीजींच्या भेटीच्या संदर्भाला चुकीच्या पद्धतीने घेतले.
आजपर्यंत मी जेव्हा-केव्हा मोदीजींना वैयक्तिक भेटण्यासाठी गेलो तेव्हा आमची भेट झालीच आहे; पण यावेळी माझी पंतप्रधानांकडे अशी मागणी होती की, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सोबत घेऊन भेट घ्यावी; पण कोविडमुळे एवढ्या सर्वांनी एकत्र येणे धोक्याचे ठरण्याची शक्यता असावी. त्यामुळे त्यांना तशी वेळ देणे सध्या शक्य होत नसेल कदाचित. मला एकट्याला जाऊन भेटणे आणि श्रेय घेणे शक्य झाले असते.
मी ठरवले तर त्यांना कधीही भेटू शकतो; पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे. तुमच्या माझ्याविषयीच्या भावनेचा मी आदर करतो. आपण सर्वजण मिळून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र राहू आणि मराठा आरक्षणाला यश हे मिळणार आहेच, या सद्भावनेसह कार्यरत राहू, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.












Leave a Reply