सातारा :दिं २८ रोजी दूुपारी १ वाजता वडूथ ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच मा. संतोष पाटील साहेब जिल्हाधिकारी सातारा यांनी प्रत्यक्ष भेट देत सुरू असलेल्या जनगणना कामाची पाहणी केली. त्यांच्या या लोकाभिमुख भेटीमुळे ग्रामस्थांसह ग्रामपंचायत प्रशासनामध्ये आनंद, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. वरिष्ठ अधिकारी स्वतः गावात येऊन सामान्य नागरिकांशी संवाद साधत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मा. प्रमोद कुंकुळे सो प्रांत अधिकारी कोरेगाव, मा. आशिष बारकूल सो प्रांत अधिकारी सातारा, मा. समीर यादव सो तहसीलदार सातारा तसेच मा. संगमेश कोडे सो तहसीलदार कोरेगाव यांनीही उपस्थित राहून जनगणना कामाचा सविस्तर आढावा घेतला. BLO अंगणवाडी सेविका व वडूथ प्रगणक श्रीमती हर्षदा इताळे मॅडम, पर्यवेक्षक श्री संजय पालवे तसेच वडूथ मंडळातील तलाठी श्री मालोजी भोसले व श्री फडतरे यांच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जनगणना कामाची पाहणी करून जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक व प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.
विशेष म्हणजे, मा. जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांनी कोणताही दिखावा न करता सर्वसामान्य माणसाप्रमाणे सामान्य कुटुंबामध्ये स्वतः जाऊन जनगणना कामाची पाहणी केली व नागरिकांशी थेट संवाद साधत प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. त्यांच्या साधेपणामुळे, संवेदनशीलतेमुळे आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थ प्रभावित झाले. “प्रशासन लोकांच्या दारी” ही संकल्पना त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याची भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली. वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ झाला.
यावेळी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाही जनगणना कामामध्ये सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यावर उपस्थित मदन साबळे व अभिजित साबळे पाटील यांनी “ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून जनगणना कामासाठी निश्चितच पूर्ण सहकार्य करू. गावामध्ये ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती व माहिती देण्यात येईल. प्रत्येक नागरिकापर्यंत प्रशासनाचा संदेश पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध राहील,” असे सांगितले.
तसेच यावेळी मदन साबळे यांनी मा. जिल्हाधिकारी साहेबांकडे वडूथ ते जारंडेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यानच्या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याबाबतही लक्ष वेधले. सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्ग बैठकीदरम्यान आपण हा रस्ता खराब झाल्याचे सांगितले होते, त्याची आठवण करून देत संबंधित विभागाला योग्य त्या सूचना करण्याची विनंती करण्यात आली. त्यावर मा. जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित बाबीची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कार्यवाही व सूचना करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या प्रसंगी अभिजित साबळे पाटील ग्रामपंचायत सदस्य, अप्पासो साबळे सदस्य, मदन साबळे सामाजिक कार्यकर्ते, विक्रांत साबळे पाटील, रमण कांबळे, उमेश साबळे सर, ग्रामपंचायत अधिकारी संजय पालवे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे कर्मचारी वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून जनगणना प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यास मोठी चालना मिळाली आहे. ग्रामस्थांनीही मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या या लोकाभिमुख भेटीचे स्वागत करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.












Leave a Reply