सातारा :
वडूथ ते जरंडेश्वर रेल्वे स्टेशनदरम्यानच्या जीर्ण रस्त्याबाबत बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने काम सुरू केल्याचे दाखवले; मात्र अवघ्या दोन दिवसांतच ते काम पुन्हा बंद पडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
बातमी आल्यानंतर यंत्रसामग्री आणून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला. पण प्रत्यक्षात दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती न करता केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आली. काहीच दिवसांत काम थांबवण्यात आले आणि रस्ता पुन्हा पूर्ववत धोकादायक अवस्थेत गेला. उखडलेले डांबर, खोल खड्डे आणि तुटलेले कडे यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
दररोज शेकडो विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थ या मार्गाने प्रवास करतात. अपघातांचा धोका कायम असताना प्रशासनाची ही निष्काळजी वृत्ती गंभीर ठरत आहे. “बातमी शांत करण्यासाठी काम सुरू केल्याचे नाटक झाले, पण नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्षच,” असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सातारा जिल्हा सचिव मदन भिमाजी साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर तीव्र टीका केली आहे.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी दिखाऊ कामे आम्ही सहन करणार नाही. तात्काळ उच्च दर्जाचे आणि कायमस्वरूपी काम सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
स्थानिक नागरिक प्रशासनाच्या ठोस आणि पारदर्शक कारवाईची वाट पाहत आहेत.
वडूथ–जरंडेश्वर रस्त्याचा प्रश्न आता फक्त विकासाचा नाही; तो जनतेच्या सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा कस लावणारा ठरला आहे.












Leave a Reply