सातारा – प्रतिनिधी
गावाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी वेळे ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवार दि.२३ जुलै रोजी प्रेरणादायी स्नेहमेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात गावातील महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत एकात्मतेने शाश्वत विकासाचा दृढ संकल्प करून सर्वांगीण विकास करणारे वेळे गाव अशी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
लोकसहभागातून नियोजन आणि श्रमदानातून घाम गाळून वेळे (वाई) गावात जलसंधारण, जलतारा, वृक्षारोपण, आणि आरोग्यदायी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.प्रमुख उपक्रमांचा महत्त्वपूर्ण आढावा घेण्यासाठी गावाने स्नेहमेळावा आयोजित केला होता. यावेळी वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्रविण प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांनी पुढील टप्प्यात कामे आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी यावर माहितीसह कृती आराखडा मांडला. त्यावर चर्चेअंती उपस्थितांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकसहभागातून योजना राबविण्याचे निर्णय घेतला.
विद्याधर गायकवाड यांनी,” शाश्वत विकासाची संकल्पना म्हणजे वर्तमान पिढीच्या गरजा भागवत असताना भविष्यातील पिढ्यांच्याही गरजांना धक्का न लागता विकास साधणे. वेळे ग्रामपंचायत याच तत्त्वावर आधारित विकासाच्या दिशेने ठाम पावले टाकत असून, पार्टिसिपेटरी डायग्नॉस्टिक इनिशिएटिव्ह (PDI) रिपोर्ट लावून विकास आराखडा आता यशस्वीतेकडे घेऊन जाण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन केले.
नाम फाउंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक जिजाबा पवार, माजी सरपंच विश्वास पवार (भाऊ), लक्ष्मण डेरे (भाऊ), रवी बोडके, सरपंच सौ. अर्चनाताई गायकवाड, उपसरपंच राहुल ननावरे, उषा पवार, निलम नलावडे, सिंधू ढमाळ, दशरथ पवार, विजय पवार, दिपक पवार, ग्रामविकास अधिकारी श्रुतिका जाधव, वेळे जलसंधारण समिती, ग्रामपंचायत कार्यकारणी, ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.












Leave a Reply