आपण भगतसिंहाला विसरलोय..
आपल्या साथीदारांना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात भगतसिंह म्हणतो,
“जगण्याची इच्छा माझ्यामध्येही असणे स्वाभाविक आहे आणि मी ते लपवू इच्छित नाही. पण कैदी किंवा बंदी म्हणून मी जगू शकत नाही..
माझे नाव आता हिंदुस्थानी क्रांतीचे प्रतीक बनले आहे. क्रांतीच्या आदर्शांनी मला एवढ्या उंच स्थानी नेऊन ठेवलं आहे की जिवंत असताना त्यापेक्षा उच्च स्थानी जाणे केवळ अशक्य..”
म्हणजे भगतसिंहाला त्याच्या बलिदानाचे महत्व माहीत होतं. आपल्या मृत्यूमुळे भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल, याची त्याला पूर्ण कल्पना होती.
हा भगतसिंह आहे.. भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या त्यागाने प्रचंड मोठा आदर्श घालून देणारा..
जो आपण विसरलोय..
विचारांवर ठाम राहायला भगतसिंहमध्ये एवढी हिम्मत येते कुठून? आपल्या मुलाला वाचवण्यासाठी किशनसिंह खटपट करतात. भगतसिंहाला ही गोष्ट समजते, तेव्हा वडिलांच्या कृतीचा निषेध करतो.. पण ते करत असताना भगतसिंह आपल्या संपूर्ण पत्रात असा एकही शब्द वापरत नाही, ज्याने वडिलांचा अपमान होईल अथवा त्यांना वाईट वाटेल. तो पत्रात लिहीतो सुद्धा,
“पिताजी, मी फार गोंधळलोय. आपण उचललेल्या या पावलाबद्दल आपल्यावर दोषारोप करताना किंवा टीका करताना मी सभ्यतेच्या सीमा तर उल्लंघत नाही ना, अशी मला धास्ती वाटते..”
हा सुद्धा भगतसिंह आहे.. भावनिक.. मायाळू.. वडिलांचा प्रचंड आदर करणारा..
जो आपण विसरलोय..
कुलतार सिंहला लिहिलेले पत्र मला तर कधी कधी वाटत, भगतसिंहाने ते माझ्यासाठीच लिहील आहे.. आपल्यासाठी लिहिलं आहे.. किती प्रेरणादायी आहे भगतसिंह पहा, तो म्हणतो
“अच्छा रुखसत । खुश रहो अहले-वतन, हम तो सफर करते है । हिम्मत से रहना..”
हिम्मत से रहना.. स्वता फासावर जातोय. दोर गळ्याभोवती पडल्यावर अवघ्या काही क्षणामध्ये आयुष्य संपणार.. आई-वडील, भाऊ, मित्र, विचार, आंदोलन, क्रांती, लढा, स्वातंत्र्य, अपेक्षा ,भविष्य, सुख-समृद्धी सगळं सगळं मागे पडणार.. कदाचित आपले अस्तित्वसुद्धा संपणार.. तरीही मोठा भाऊ लहाण्याला सांगतो, ‘भाऊ, हिमतीने रहा बाबा..’
हा भगतसिंह आहे.. निडर, बलवान आणि आदर्शवत..
जो आपण विसरलोय..
कोर्टात दिलेल्या वक्तव्यात भगतसिंह म्हणतो,
“आझादी प्रत्येक मनुष्याचा हक्क आहे.. जर कोणतेही सरकार त्यांच्या जन्मसिद्ध हक्कांपासून त्यांना वंचित ठेवत असेल, अथवा त्या हक्कांवर गदा आणत असेल, तर ते सरकार उलटून टाकलं पाहीजे.. नष्ट केलं पाहिजे..”
हा भगतसिंह आहे.. विचारांवर पक्षापेक्षा, व्यक्तीपेक्षा आणि व्यवस्थेपेक्षा जास्त प्रेम करणारा आणि त्यावर ठाम राहणारा..
जो आपण विसरलोय..
वृत्तपत्रांवर लिहीतो,
“वृत्तपत्रे हे सांप्रदायिक दंगली भडकवण्यात विशेष भागीदारी करणारे दुसरे सद्गृहस्थ आहेत. पत्रकारितेचा व्यवसाय एकेकाळी अत्यंत पवित्र समजला जायचा. तो आज अत्यंत किळसवाणा झाला आहे..”
भगतसिंह लिहीतो,
“या सांप्रदायिक दंगलीचे मूळ शोधत असताना असे दिसून येते, की या पाठीमागे आर्थिक कारण आहे..”
जगण्याच्या हक्कावर तो म्हणतो,
“जगातील सर्वच गरिबांना समान अधिकार आहेत. मग ते कोणत्याही जातीचे, वर्णाचे, धर्माचे वा राष्ट्राचे असो..”
धर्म आणि राजकारणावर लिहीतो,
“धर्माला जर राजकारणापासून दूर ठेवलं तर आपण सर्व एकत्र होऊ शकतो. धार्मिकदृष्ट्या भले आपण वेगवेगळ्या धर्मात असू, त्यामुळे काहीही बिघडणार नाही.”
अस्पृश्यतेवर लिहीतो,
“जर तुम्ही त्यांना पशूहूनही हीन समजत असाल, तर ते नक्कीच दुसऱ्या धर्माचा आश्रय घेतील, जिथे त्यांच्याशी माणसासारखा व्यवहार केला जाईल.”
हा भगतसिंह आहे.. किती सोप्या शब्दात समाजातील प्रश्न सोडवतो हा?
आश्चर्य याचेच वाटते, की 90 वर्षानंतर सुद्धा त्याचे विचार अगदी तंतोतंत लागू पडतात.. भारताने स्वातंत्र्यानंतर राहणीमानाचा दर्जा सुधारला आहे, विचारांचा दर्जा नाही.. हेच यातून स्पष्ट होते.
हा भगतसिंह आहे.
जो आम्हाला पचणार नाहीच.. काहीही झालं तरी..
जोपर्यंत भगतसिंह आहे, तोपर्यंत कधीच एखाद्या वैचारिक, दिशादर्शक मित्राची कमी आयुष्यात जाणवणार नाही..
हा माझा ‘दोस्त’ भगतसिंह आहे..
आजच्या दिवशी फासावर जाऊन फक्त शरीरचेतनेतून मुक्त झालाय..
आपल्यासारख्या लाखो भरकटलेल्या तरुणांच्या मनात ‘प्रेरणा’, ‘शक्ती’ आणि ‘विचार’ म्हणून जिवंत आहे..
फक्त एकदा शोधून बघा..
तुम्हाला ‘तो’ दिसेल.. पत्र लिहिताना, पेपर वाचताना, टिपणे काढताना.. नाहीतर फक्त मंद स्मित करून जगण्याची शिकवण देणारा..
प्रचंड मोठा क्रांतिकारी म्हणून, समाजसुधारक, स्वतंत्रता सेनानी म्हणून नाहीतर आदर्श विचारवंत म्हणून त्याच्याकडे पाहू नका..
एक मित्र म्हणून बघा..
भगतसिंह सापडेल.. आपल्याच विचारांमध्ये..
यार भगत.. प्यार भगत ❤️
इन्कलाब जिंदाबाद..
श्री मदन भिमाजी साबळे
जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा












Leave a Reply