शकुंतलेश्वर मंदिर वडूथ येथे शानदार दीपोत्सव २०२४ दिमाखात साजरा*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

*शकुंतलेश्वर मंदिर वडूथ येथे शानदार दीपोत्सव २०२४ दिमाखात साजरा*
। सातारा । विशेष प्रतिनिधी ।

सालाबादप्रमाणे दीपावली पाडव्याला नियमितपणे अखंडित साजरा २०१२ पासून दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर वडूथ, सातारा येथील यंदाचा दीपोत्सव येथील ग्रामस्थांनी दिमाखात साजरा केला.

संस्थापक अध्यक्ष :- मा. श्री. मदन भिमाजी साबळे यांच्या सौजन्याने आज दिपोत्सव २०२४ उत्साहात संपन्

यावेळी हाजारो पणत्यांचे संकलन ग्रामस्थांनी केले. रात्रीच्या अंधारात या पणत्यांच्या प्रकाशाने शकुंतलेश्वर मंदिर परिसर लख्ख प्रकाशाने उजळून गेला. या शानदार प्रकाशपर्वाचे हजारो वडूथवासिय साक्षिदार बनले. व दिमाखदार सोहळ्याचा मनोमन आनंद लुटला.

वडूथ ता. जि. सातारा येथील कृष्णाकाठी असलेले श्री शकुंतलेश्वर मंदिर… सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारे गाव वडूथ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमितील ऐतिहासिक पार्श्वभूमि असलेल्या या श्री शिवशंकराच्या मंदिराकडे दरवर्षी श्रावण मासात भावीकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. निसर्गरम्य वातावरणात कृष्णेच्या तिरावर बांधलेल्या या मंदिरासमोरून खळाळून वाहणारी कृष्णा नदी, त्याचप्रमाणे कृष्णेच्या तिरावर सुंदर दडगी रेखीव शकुंतलेश्वराचे मंदिर. अशा नयनरम्य, निसर्गसंपन्न वातावरणात असलेल्या या मंदिराची अख्यायिका अशी…

तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव पुण्याहून सातारा येथे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे मानाची पेशवाईची वस्त्रे सन्मानपूर्वक नेण्यासाठी वडूथमार्गे सातार्‍याला जात असताना वडूथ येथे त्यांचा मुक्काम होता. एके दिवशी त्यांना कृष्णा काठावर सुप्रभाती शकून घडला. त्यावरुन त्याच स्थळी त्यांनी २४ ते ३० मे १७५८ या सहा दिवसात शकुंतलेश्वर मंदिराची स्थापना केली. व पिंडीचा मुख्य गाभारा बांधून नंतर सातारा येथे वस्त्रे आणण्यास गेले. याच त्या शकुंतलेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभल्याने एक अनोखे महत्त्व प्राप्त झालेले आहे. हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून देखील ओळखले जाते. असे नयनरम्य, विलोभनीय, निसर्गसंपन्न परिसरात हे मंदिर उभारण्यात आले. आजही पुराचे पाणी कृष्णा नदीमध्ये आले तर त्या ठिकाणी त्या मंदिराला पाण्याचा पूर्ण वेडा पडतो. काही काही वेळा असा प्रसंग येतो की पेशवेकालीन असलेले हे मंदिर पूर्ण पाण्याखाली जाण्याचा अनुभव ग्रामस्थ व पंचक्रोशीकरांना मिळतो.

शकुंतलेश्वर मंदिराला जसे ऐतिहासिक महत्त्व आहे तसेच पौराणिक महत्त्वदेखील आहे. फार वर्षापूर्वी इंद्रदेव गिधाड रूपाने निचुल ऋषींची परीक्षा घेण्यासाठी कृष्णाकाठी आले असता त्यांनी ऋषींना नरमांस देण्याची भिक्षा मागितली. ऋषींनी आपल्या मुलांना सांगितले की, भगवंताचा स्वर्ग मोक्ष प्राप्त होणारा आनंद आहे. तुम्ही तुमचे मांस या गिधाडाला द्या. यावर आम्ही मांस देणार नाही, असे उलट उत्तर मुलांनी ऋषींना दिले. त्यामुळे ऋषींनी मुलांना शाप दिला. मात्र गिधाडाला ऋषींनी स्वतःचे मांस देण्याची तयारी दर्शविली. तेव्हा इंद्रदेवाने गिधाडाचे रुप बदलून स्वरूप प्रकट केले व ऋषींना म्हणाले आपण फार उदार आहात मी आपली परीक्षा पाहिली. मी इंद्रदेव आहे. त्यावर ऋषी रागावले व त्यांनी इंद्रदेवाला शाप दिला की तुम्ही येथे हजारो वर्षे शकुंत पक्षी होऊन राहावे. जेव्हा तुम्हाला अगस्ती ऋषी भेटतील तेव्हा तुमची मुक्तता होईल. पुढे कालांतराने त्यांना अगस्ती ऋषी भेटले. व म्हणाले या ठिकाणी कृष्ण तीर्थ म्हणून नावारुपास येईल. आपण तपश्चर्या केल्यामुळे त्यांना प्रसन्न होऊन वर दिला की, आपण शाकुंतेश नावाने राहून तुम्ही या ठिकाणी अक्षय्य वास्तव्य करून राहावे. तेव्हापासून हे तीर्थ परम पवित्र व जागृत दैवत बनले आहे
. पुढे पेशव्यांनी या ठिकाणी मंदिर स्थापन करुन या ठिकाणाला शकुंतलेश्वर हा नावलौकि मिळाला.

त्याचप्रमाणे पंचक्रोशीत कुठेही नसणारे श्री विष्णूचे मंदिर वडूथ गावात आहे. तसेच श्रीरामाचे मंदिर आहे. बानेश्वर म्हणून श्री शंकराचे मंदिर आहे तर मारुती व श्री गुरुदत्त व नागदेव तसेच सटवाई देवी व चिलुबाई देवी व लक्ष्मी आई व म्हसोबा , सावतामाळी व बोधले महराज मंदिरदेखील आहे. वडूथ गावचे ग्रामदैवत श्री म्हातोबाचेदेखील या गावात मंदिर आहे. थोडक्यात ऐतिहासिक मंदिरांचे गाव म्हणूनही वडूथ गावाची ओळख बनली आहे.

जेव्हापासून सातारा शहराची निर्मिती झाली तेव्हापासून वडूथ गावची बाजारपेठ आहे. वडूथ गावामध्ये आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांची वर्दळ होत असते. बाजारासाठी ग्रामस्थ नियमित ये-जा करतात. या गावात अनेक सुखसोयी आहेत. जसा काळ उलटला तशा गावातील सुखसोयीदेखील वाढत गेल्या. शकुंतलेश्वर मंदिरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. गावातील तरुण तरुणी तसेच ग्रामस्थ अतिशय उत्स्फूर्तपणे या कायक्रमांत मोठ्या उत्सवाप्रमाणे सहभागी होतात. दिवाळीत प्रत्येकाच्या घरात दिवा असतो मात्र यावेळी मंदिरात ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. वडूथ येथील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून २०१२ सालापासून दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली. ही परंपरा अखंडीत ठेवण्याचाही मानस आहे. पुढील पिढीनेही यामध्ये खंड न पाडता दरवर्षी आनंदाने दीपोत्सव साजरा करावा असा मनोदय वडूथ करांचा आहे.

यामुळे तेव्हापासून प्रत्येक वडूथवासिय प्रकाशवाटेने आपला प्रवास करत आहे, असे मानन्यास हरकत नाही. तर कित्येकांचे जीवनच प्रकाशमय झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *