लाईव्ह महाराष्ट्र 24 । मुंबई ।
मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतचा नारा दिला असला तरी भारत अजूनही चीनमधून येणाऱ्या अनेक वस्तूंवर अवलंबून आहे. याचीच आता पहिली परीक्षा भारताला द्यावी लागणार आहे. कारण, औषधे बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या केएसएम म्हणजेच ‘की स्टार्टिंग मटेरियल’चे दर चीनने १०-२० टक्क्यांनी वाढवले आहेत. केएसएम आणि एपीआयची (सक्रिय औषधी घटक) भारतात अँटीबायोटिक्स, स्टिरॉइड्स आणि इतर औषधे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. विशेषतः ही आयात चीनमधून होते.
चीनने किंमती वाढवल्यामुळे भारतीय कंपन्यांना याचा फटका बसणार आहे. कच्चा माल महागल्यामुळे उत्पादनाची किंमतही महाग होऊ शकते. भारतीय फार्मा क्षेत्र आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत आहे, तसंच सरकारनेही आत्मनिर्भरचा नारा दिला आहे. याला ब्रेक लावण्यासाठी चीनने ही चाल खेळली असल्याची चर्चा आहे.
कसा होईल भारतावर परिणाम?
आयात होणाऱ्या केएसएमची किंमत वाढल्यामुळे भारतातील औषध निर्मितीवर याचा मोठा परिणाम होईल. जगभरात चीनच्या एपीआयची निर्यात मोठ्या प्रमाणात होते आणि भारतही याला अपवाद नाही. सध्या केएसएम आणि एपीआयसाठी भारत चीनवर अवलंबून आहे. ७० ते ८० टक्के मुलभूत कच्चा माल औषध बनवण्यासाठी चीनमधून आयात केला जातो.
अत्यावश्यक असलेल्या सेफालोस्पोरिन्स, अझिथ्रोमीसिन आणि पेनिसिलिन यांसारख्या अँटीबायोटिक्ससाठी भारत चीनवर ९० टक्के अवलंबून आहे. देशांतर्गत निर्मिती आणि आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकारने ५० एपीआयच्या निर्मितीवर सवलत जाहीर केली आहे. या एपीआयसाठी भारत चीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.














Leave a Reply