पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव प्रसाद ढगेपाटील मांडणार प्रश्न
पाणीप्रश्नावर जनतेसह आता सर्वपक्षीय नेते एकवटले!
लाईव्ह महाराष्ट्र 24।
। पनवेल । विशेष प्रतिनिधी।
गेल्या अनेक वर्षापासून तळोजा फेस 1, तळोजा फेस 2 , पेंधर व परिसरातील नागरिक अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. पाणीपुरवठ्याची नैतीक जबाबदारी सिडको प्रशासनाची असून, सिडको व एमआयडीसीमध्ये ‘पाणी करार’ झाला आहे. बाल्टर करारानुसार एमआयडीसीने दहा एमएलटी पिण्याचे पाणी परिसराला देणे आवश्यक आहे. परंतु येथील रहिवाशांना दररोज पाच ते सहा एमएलटी पाणी मिळते. तेही अपुर्या दाबाने. कधी कधी तर शटडाउनच्या नावाखाली प्रशासनाकडून पाच सहा दिवस एक थेंबही परिसरामध्ये पाणी पुरवला जात नाही. यासंदर्भात येथील सजग नागरीक तसेच सर्वपक्षीय राजकीय नेते एकवटले असून, या प्रकरणाचा तपास केला असता. तळोजामधील बिल्डर लॉबी बांधकामांसाठी राजरोसपणे पिण्याचे पाणी वापरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पाणी प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव प्रसाद ढगे पाटील आता पालकमंत्र्यांच्या जनता दरबारामध्ये सदर पाणी प्रश्न मांडणार आहेत. त्यामुळे आता पालकमंत्री आदिती तटकरे या प्रश्नाकडे किती गांभिर्याने पाहताहेत याकडे तळोजावासियांचे लक्ष वेधले जाणार आहे.
पाणी प्रश्नासाठी विविध पक्षांनी गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष केला. एवढेच काय तर प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला.
विविध मागण्या करण्यात आल्या परंतु, तात्पुरत्या उपाययोजनांशिवाय येथील नागरिकांच्या हाती काहीच लागले नाही. सिडको व पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत तळोजा परिसर हा मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. सध्या वास्तव्यास असणार्या लोक वस्तीला व ग्रामीण परिसरालाच पाण्याचा एवढा त्रास होत आहे याशिवाय झपाट्याच्या विकासामुळे या परिसरातील लोकसंख्या वाढत आहे त्यानुसार पाण्याची गरज ही वाढत आहे. परिणामी येथील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झालेली पहायला मिळत आहे. त्यातच सिडकोकडून मिळणारे पाणी अपुरे पडते म्हणून लोक पाण्याचे टँकर विकत घेऊन आपली गरज भागवत आहेत. हे माहित असून देखील विकास कामांसाठी व बांधकाम व्यवसायासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो, अशी माहिती समोर येत आहे. सदर बाब ही माध्यमांसमोर भारतीय जनता पार्टीचे खारघर विभागीय उपाध्यक्ष निर्दोष केणी यांनीही आणली. मात्र तरीही ढिम्म प्रशासनाला अ्द्याप काही जाग आलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या राष्ष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट पालकमंत्रत्र्यांकडेच जनता दरबारात प्रश्न उपस्थित करण्याचा पवित्रा घेतला आहे.
जनतेकडून अलीकडच्या काळामध्ये होणारी वारंवार पाण्याबद्दलची तक्रार पाहून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा सचिव प्रसाद ढगेपाटील यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे निवेदन दिले होते. तसेच त्यांना विनंती केली होती की सिडको व एमआयडीसी वरिष्ठ अधिकार्यांचीे समन्वय बैठक बोलावून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावावा. आदितीताई यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद देऊन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. परंतु आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असून, टँकर माफियांच्या व बिल्डर लॉबीच्या शंकास्पद हालचाली दिसून येऊ लागल्या आहेत.
त्यामुळे हे प्रकरण निर्णायक परिस्थितीवर येऊन ठेपले असून, महाराष्ट्र शासनाने यामध्ये लवकरात लवकर हस्तक्षेप करून कायमस्वरूपाची पाणीपुरवठा व्यवस्था करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान, विविध मागण्यांसह स्थायी स्वरूपाचा पाणीपुरवठा मिळण्यासाठी येत्या बुधवारी जनता दरबारात प्रसाद ढगेपाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध वरिष्ठ आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ जनता दरबार राष्ट्रवादी भवन येथे जाणार असून, निर्णायक स्वरूपाचे आश्वासन घेऊनच परत येऊ अशा स्वरूपाचा निर्धार शिष्टमंडळाने केला आहे.







Leave a Reply